नवी दिल्ली : देशभरात गटारे आणि सेप्टिक टँक साफ करताना होणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या मृत्यूंची संख्या २०२६ मध्ये चिंताजनकरीत्या वाढली आहे. सफाई कर्मचारी आंदोलन (एसकेए) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्या १८८ दिवसांतच १०१ स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाला असून, सरासरी दर ४५ तासांनी एका कामगाराचा जीव जात असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Manual Scavenging Deaths)
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बुधवारी मध्य प्रदेशातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर हा आकडा १०० च्या पुढे गेला. हाताने मैला साफ करण्यावर कायदेशीर बंदी असतानाही अशा घटना सातत्याने घडत असल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. एसकेएच्या आकडेवारीनुसार, यंदा आतापर्यंत १६ राज्यांमध्ये गटारे आणि सेप्टिक टँक साफ करताना मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक १२ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण २०२५ मध्ये १२१ मृत्यू झाले होते, तर २०२६ मध्ये केवळ सहा महिन्यांतच १०१ जणांचा जीव गेला आहे. (Manual Scavenging Deaths)
Also Read : हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे
संघटनेने म्हटले आहे की, स्वच्छता कामगारांच्या मृत्यूकडे सरकार दुर्लक्ष करत असून, या प्रश्नावर “गुन्हेगारी मौन” बाळगले जात आहे. दलित समाजातील कामगारांच्या जीविताला अपेक्षित महत्त्व दिले जात नसल्याची टीकाही करण्यात आली आहे. एसकेएने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये ‘हाताने मैला साफ करण्याच्या कामावर बंदी आणि त्यांचे पुनर्वसन कायदा’ लागू झाल्यापासून गटारे व सेप्टिक टँकमध्ये काम करताना १,७२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तामिळनाडू, गुजरात, दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहार या सात राज्यांमध्येच १,२०३ मृत्यू झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच संघटनेने केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ (NAMASTE) योजनेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारण्यात आली असली, तरी स्वच्छता कामाचे पूर्ण यांत्रिकीकरण झाले नसल्यामुळे कामगारांना अजूनही जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागत असल्याचे संघटनेने नमूद केले. राष्ट्रीय संयोजक बेझवाडा विल्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गटार आणि सेप्टिक टँकमधील मृत्यू तातडीने थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वच्छता कामाचे संपूर्ण यांत्रिकीकरण, कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे. (Manual Scavenging Deaths)
Also Read : धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन
दरम्यान, हाताने मैला साफ करण्यावर बंदी घालणारा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश अस्तित्वात असतानाही देशभरात निर्दोष स्वच्छता कामगारांचे जीव जात आहे. “आमच्या जीवाची किंमत कवडीमोलाची आहे का? आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना वारंवार कामगारांचा मृत्यू होत असतानाही या घटनांना माध्यमांमध्ये अपेक्षित स्थान मिळत नाही,” अशी तीव्र भावना अनेक स्वच्छता कामगारांनी व्यक्त केली आहे.
कामगारांचे म्हणणे आहे की, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता केवळ चर्चेचा विषय न राहता सरकारने त्यावर तातडीने आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे. सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Manual Scavenging Deaths)





