देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून येथे नंदा की चौकी परिसरात सुमारे १६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा भाग मुसळधार पावसामुळे खचला आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या १६ दिवसांतच ही घटना घडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाला जोडणारा रस्ता अचानक खचून मोठा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे हा पूल देहराडून–पाँटा साहिब राष्ट्रीय महामार्गापासून पूर्णपणे तुटला आणि वाहतूक बंद करावी लागली. या पुलाचे उद्घाटन १२ जुलै रोजी करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच ठिकाणचा जुना पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.
दरम्यान, रस्ता खचल्यामुळे देहराडून, विकासनगर आणि शेजारील हिमाचल प्रदेश यांदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहने झाझरा मार्गे वळवण्यात आली आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाचा जोडरस्ता इतक्या कमी कालावधीत खचल्याने सार्वजनिक निधीचा वापर, बांधकामाचा दर्जा आणि देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.





