मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टद्वारे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांनी अनुक्रमे पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमधील निवडणूक निकालांना आव्हान देत त्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिका दाखल कराव्यात, असे म्हटले आहे.
आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये ADR विरुद्ध निवडणूक आयोग (ADR v ECI) प्रकरणाचा संदर्भ देत म्हटले आहे की, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे नागरिकत्वाबाबतच्या संशयाच्या आधारावर वगळण्यात आली होती. ADR v ECI प्रकरणातील परिच्छेद १७१ मध्ये नागरिकत्वाचा औपचारिक निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Also Read : यवतमाळातील लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा; ॲड. डी. के. दामोधर यांच्या पाठपुराव्याला यश
आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. केवळ पश्चिम बंगालमध्येच ९० लाखांहून अधिक मतदारांची नावे नागरिकत्वाच्या कारणावरून हटविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, प्रकरणातील परिच्छेद १८६ (h) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक आयोगाच्या मते एखादी व्यक्ती नागरिक नसल्याच्या कारणावरून तिचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्यास, असे प्रकरण चार आठवड्यांच्या आत गृह मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.
याचा अर्थ निवडणूक आयोगाने काही व्यक्तींना नागरिक नसल्याचे गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळली. मात्र, नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार हा भारत निवडणूक आयोगाकडे नसून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहे, असे न्यायालयानेही स्पष्ट केले असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
Also Read : धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
त्यामुळे तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि राजद यांनी संबंधित निवडणूक निकालांना विरोध करून पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमधील निवडणुका अमान्य ठरविण्याची मागणी करणाऱ्या नव्या याचिका दाखल कराव्यात, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.






