मुंबई : अल्पवयीन मुली आणि विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध सुरू असलेली कारवाई ही तरुणांच्या मनात भीती निर्माण करून स्वतंत्र विचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. त्यांनी ही भूमिका आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) सोशल मीडिया खात्यावर केलेल्या पोस्टद्वारे मांडली.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमुळे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गुन्हेगारीकरण होत असून, ही परिस्थिती जॉर्ज ऑर्वेल यांच्या 1984 या कादंबरीची आठवण करून देणारी आहे.
तसेच, प्रशासन आणि पोलिसांनी अल्पवयीन मुलींविरुद्ध तत्परतेने कारवाई केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलितांविरोधात सोशल मीडियावर जातीय द्वेषपूर्ण वक्तव्ये, द्वेषमूलक भाषण आणि अश्लील भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध तसेच अल्पवयीन मुलींची खासगी माहिती सार्वजनिक करणाऱ्यांविरुद्ध समान तत्परतेने कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात चीनने घुसखोरी करून लष्करी चौक्या उभारल्याच्या वृत्तांचा उल्लेख करत, केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चीनची घुसखोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर का झाला नाही? अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्याऐवजी चीनसमोर सरकारचा तोच आक्रमकपणा का दिसत नाही?” असा प्रश्नही त्यांनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.





