सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळील उवा गावाजवळ मंगळवारी दोन महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) बस आणि पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर एका बसला आग लागल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरून प्रवास करत होती. यावेळी बसची पुढे जाणाऱ्या पाण्याच्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या जळगाव–सुरत एसटी बसला ती समोरासमोर धडकली. (Surat Bus Accident)
Also Read : बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांना आव्हान द्या; नव्या याचिका दाखल करा : ॲड. प्रकाश आंबेडकर
धडक इतकी भीषण होती की धुळे–सुरत बस दोन वेळा उलटली आणि त्यानंतर तिला आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे बसमधील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्यादरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला. जखमींना बारडोली आणि परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Surat Bus Accident)
Also Read : धर्माबादमध्ये भीम आर्मीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
दरम्यान या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही आपल्या सोशल मीडिया x (ट्विटर) वर पोस्ट करत शोक व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या दोन बसची गुजरात राज्यातील सुरत येथे समोरासमोर धडक झाली. या दुर्दैवी अपघातात ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातातील मृतांना भावपूर्ण आदरांजली तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.





