पिंपरी-चिंचवड : “राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे,” अशा घणाघाती शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोशी येथील दुर्घटनेला तब्बल ४४ तास उलटून गेले तरी अद्याप बचावकार्य पूर्ण झालेले नाही. या संथ कारभारावर आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर प्रकाश आंबेडकरांनी तीव्र शब्दांत बोट ठेवले. ते म्हणाले की, हे बचावकार्य युद्धपातळीवर व्हायला हवे होते, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढता आले असते. जमिनीखाली माणूस जिवंत आहे की नाही, हे शोधणाऱ्या यंत्रांद्वारे तातडीने माहिती घेऊन प्रशासनाने ती नातेवाईकांना स्पष्ट सांगायला हवी.
मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या या दुर्घटनेनंतर गेल्या ४४ तासांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, लष्कराचे जवान आणि पोलीस प्रशासन ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या विलंबाTargetमुळे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत असून, जर येथे एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर यंत्रणेने लगेच काम फत्ते केले असते, असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी कचरा डेपो आणि महापालिकेच्या नियोजनातील त्रुटींवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, याचे मॅनेजमेंट व्यवस्थित करावे लागेल हे यामधून दिसत आहे. कामगारांचे नुकसान झाले, कामगार गेले ही एक अत्यंत दुखद बाब आहे. छोटी महापालिका असली तरीही हा कचऱ्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच येत आहे, याच्यामध्ये सल्यूशन देणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्हाला याची एक्सपर्ट कमिटी करता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला जुन्या पद्धतीनेच त्यावर प्रक्रिया करावी लागेल.
माझ्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दररोज सुमारे १४०० टन कचरा असतो. त्याकरिता पहिल्यांदा तेवढा कचरा साठवण्यासाठी जागा लागेल. कामगार आणि ढिगारा वेगवेगळ्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून महापालिकेने स्वतःच्या जागा विकत घेतल्या पाहिजेत. तसेच तिथे लोकवस्ती नसणार हे देखील बघितले पाहिजे, कारण कचरा डेपोच्या बाजूला बिल्डिंग असू शकत नाही.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जे बाधित कुटुंब आहे, त्यांना न्याय कसा मिळेल हे आम्ही बघू. मुख्यमंत्र्यांसोबत बसून हा जो घनकचरा आहे, त्याबाबत ‘गॅसिफिकेशन’ जी पद्धत आली आहे, त्यामधून वेगळा मार्ग काढला पाहिजे असे मला वाटते. या संपूर्ण प्रकरणात ठेकेदार हा गुन्हेगार आहेच आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होणारच, पण सोबतच महापालिकेचे अधिकारीही यामध्ये कारवाईच्या कचाट्यात येणार आहेत, असा इशाराही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.




