भोपाळ : मध्य प्रदेशात मूग उत्पादक शेतकऱ्यांचा रोष आता रस्त्यावर उतरला आहे. आपल्या घामाच्या पिकाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी हजारो शेतकरी भोपाळच्या दिशेने निघाला आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन काही तासांचे नसून दीर्घकालीन लढ्याची तयारी करूनच शेतकरी मैदानात उतरले आहेत. आठवडाभर पुरेल इतके अन्नधान्य, अंथरूण-पांघरूण आणि स्वयंपाकाची भांडी सोबत घेऊन ते सावरकर सेतू परिसरात ठिय्या देऊन बसले आहेत.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तब्बल 19 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, काही भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे मूग खरेदीवरील मर्यादा. राज्यात यंदा 8.06 लाख मेट्रिक टनांहून अधिक मूग उत्पादन झाले असताना सरकारने केवळ 4.54 लाख मेट्रिक टन खरेदीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यामुळे लाखो क्विंटल मूग MSPच्या कक्षेबाहेर जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकरी संघटनांच्या मते, तूर, उडीद आणि मसूर या डाळींची 100 टक्के MSPवर खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र मूगाची खरेदी अजूनही प्राईस सपोर्ट स्कीम (PSS) अंतर्गत मर्यादित प्रमाणातच होत आहे. या योजनेत उत्पादनाच्या केवळ 25 टक्के खरेदीची अट असल्यामुळे उर्वरित माल शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने विकावा लागत आहे.
2026-27 हंगामासाठी मूगाचा MSP ₹8,768 प्रति क्विंटल निश्चित असला तरी बाजारात त्यापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. शेतकरी नेते संतोष पाटवारी यांनी सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून सरकारशी सातत्याने चर्चा करूनही कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या मोर्चाची सुरुवात नर्मदापुरम येथील सेठाणी घाटावरून झाली. सुरुवातीला प्रशासनाने मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे अडथळे हटवावे लागले. त्यानंतर मोर्चा ओबेदुल्लागंज आणि रायसेन मार्गे भोपाळकडे रवाना झाला. शहराच्या प्रवेशद्वारांवर, टोल नाक्यांवर आणि मंडीदीप परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या मते, ही लढाई केवळ मूग खरेदीची नाही; तर शेतीमालाला न्याय्य दर, वेळेत खरेदी, खतांची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठीची आहे. त्यामुळे 100 टक्के MSPवर मूग खरेदीची मागणी आता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनली आहे.





