मुंबई : वंचित बहुजन आघाडी (मुंबई प्रदेश) तर्फे दादर-माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ अंतर्गत पहिल्या ‘VBA सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. समाजातील शोषित-वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या तसेच विविध क्षेjत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महमानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर, मुंबई प्रदेश महिलाध्यक्षा स्नेहल सोहनी, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, युवा अध्यक्ष सागर गवई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या पुरस्काराने शिक्षणतज्ज्ञ राजू केंद्रे, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग सुवर्णपदक विजेत्या सरिता कदम, पर्यावरणवादी प्रकाश भोईर, ‘जागल्या भारत’चे मुख्य संपादक मिलिंद धुमाळे, सिनेदिग्दर्शक किशोर बेळेकर, भारतातील पहिल्या तृतीयपंथी फोटोजर्नलिस्ट जोया लोबो, समाजसेवक सुमेध जाधव, उद्योजक गौरव सोमवंशी, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे, लोकगायक साजन बेंद्रे, अभिनेता गौरव मोरे आणि समाजसेविका उमाताई जाधव यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना मान्यवरांनी आपल्या कार्याचा प्रवास आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त केली. राजू केंद्रे यांनी वंचित समाजातून जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. सरिता कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही खेळातील वाटचाल कायम ठेवत ग्रामीण भागात नवे खेळाडू घडविण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. प्रकाश भोईर यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
पत्रकार मिलिंद धुमाळे यांनी माध्यम स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त करत हा पुरस्कार शहीद पत्रकारांना समर्पित केला. दिग्दर्शक किशोर बेळेकर यांनी सामाजिक वास्तव मांडणाऱ्या चित्रपटांवर भर देण्याची भूमिका मांडली. जोया लोबो यांनी तृतीयपंथीय समाजाच्या सन्मान आणि प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर भाष्य केले.
सुमेध जाधव यांनी हा सन्मान सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना समर्पित केला, तर गौरव सोमवंशी यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना उद्योजकतेची प्रेरणा म्हटले. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून संविधान, समता आणि आंबेडकरवादी विचारांचा संदेश दिला.
समारोप प्रसंगी सुजात आंबेडकर म्हणाले की, आंबेडकरवादी विचारांशी तडजोड न करता शिक्षण, तंत्रज्ञान, कला आणि विविध क्षेत्रांत बहुजन समाजाने मोठी प्रगती केली आहे. या यशाचा उत्सव साजरा करणे तितकेच महत्त्वाचे असून पुढील वर्षीचा जलसा अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येईल.
प्रास्ताविकात स्नेहल सोहनी यांनी ‘VBA सन्मान पुरस्कार’ हा केवळ पुरस्कार नसून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांतून संघर्ष करून पुढे आलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव असल्याचे सांगितले. ‘जय भीम, जय संविधान, जय भारत’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.






