औरंगाबाद : राज्यातील बेरोजगार तरुण, महिला, अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध स्वावलंबन योजनांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गेल्या काही वर्षांत अनेक रोजगाराभिमुख व स्वयंरोजगाराच्या योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याने बेरोजगार तरुणांना त्याचा लाभ मिळत नाही. परिणामी बेरोजगारी आणि नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.
मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली नॅशनल लाइव्हस्टॉक मिशन (NLM) योजना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचा आरोप करत, गाय, म्हैस व शेळीपालनासाठी देण्यात येणारी ५० टक्के अनुदानाची योजना तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना अद्याप महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेली नसल्याने ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत. ही योजना केवळ घोषणेतच न राहता तातडीने सुरू करून पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच स्टार्टअप कर्ज योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जाची घोषणा झाली असली तरी राष्ट्रीयकृत बँका कर्ज मंजूर करत नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत सर्व बँकांना आवश्यक निर्देश देण्याची मागणी करण्यात आली.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत १५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी अनुदान व कर्ज योजना तातडीने सुरू कराव्यात, तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि राष्ट्रीयकृत बँकांना स्टार्टअप व स्वयंरोजगारासाठी कर्ज मंजूर करण्याबाबत सक्त आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा. मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष (मध्य) मिलिंद पुंडलिक बोर्डे, महासचिव भगवान खिल्लारे, महासचिव आनंद शेजुळ, संघटक दामोदर दाभाडे, उपाध्यक्ष प्रकाश दाभाडे, सचिव राहुल गायकवाड, अशोक गवळी, राहुल वोलदेडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






