शहापूर : औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथे जवळा बाजार समितीतील कथित भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) दोन तास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. हिंगोलीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक लूट, बेकायदेशीर ‘कट्टी’, पेमेंटमध्ये होणारा विलंब, भूखंड घोटाळा, नियमबाह्य नोकरभरती तसेच सीसीआय कापूस खरेदीतील बनावटगिरी याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाची तीव्रता वाढताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
मुख्य आरोप असे :
– शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे देणे बंधनकारक असतानाही ७–८ दिवस विलंब
– प्रति पोते २ ते ३०० किलोपर्यंत बेकायदेशीर ‘कट्टी’
– वजन काट्यांमध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक
– जवळा बाजार समितीत भूखंड वाटपात अनियमितता
– शासन स्थगिती असूनही नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार
– सीसीआय कापूस खरेदीत बनावट ७/१२ उताऱ्यांद्वारे फसवणूक
जिल्हा निबंधक प्रतिनिधी एम. यू. यादव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
या आंदोलनामुळे काही काळ शिरड शहापूर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनात अनिल कांबळे, आनंद ढेंबरे, श्यामसुंदर ठोंबरे, यश राठोड, मुंजाजी जोगदंड, अनिकेत गायकवाड, आसिफ रजा, उमेश रावले, केशव शेळके, अनिल टाकणखार, दीपक बेले, रमेश इंगोले, सय्यद रशीद, अजहर चाऊस, सोफियान चाऊस, इसाक बागवान, यशवंत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी सहभागी झाले होते.






