अकोला : ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ अंतर्गत महिला बचत गटांना बांबू व चारा लागवडीसाठी पडीत व मोकळ्या शासकीय जमिनी नाममात्र एक रुपया दराने उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र, अकोला जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करताना वर्षानुवर्षे शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगीतले.
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बांबू व चारा लागवडीसाठी महिला बचत गटांना देण्याच्या प्रक्रियेला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेसाठी शासनाच्या इतर पडीत व मोकळ्या जमिनींचा वापर करण्यात यावा आणि वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या सुपीक जमिनी नियमानुसार नियमित (नियमाकुल) करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. गरीब शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा विचार न करता त्यांच्या ताब्यातील सुपीक शेती काढून घेणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बांबू व चारा लागवडीसाठी देण्याचा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपाली खंडारे, सुनील इंगळे, सुनील फाटकर, गजानन गवई, मनोहर बनसोड, पवन बुटे, किशोर जामनिक, गोपाल चव्हाण, सुरेंद्र ओईंबे, सुमित नवलकर, अमित निमकंडे, ॲड. राजेंद्र वानखडे, प्रदीप पळसपगार, गोपाल ढोरे, अमर डिकाव, शंकर इंगोले, किशोर तेलगोटे, ज्योती खिल्लारे, योगेश खंडारे, नितीन सपकाळ, अमोल कल्लोरे, सुरेश कल्लोरे, सुशील मोहोळ, शीलवंत शिरसाट, विकास सदाशिव, प्रा. मोरे, दादाराव वानखडे, नाजूकराव इंगळे, प्रकाश भारसाकडे, विश्वनाथ भारसाकडे, संजय दांडगे, निलेश वाहुरवाघ, हर्षल लोखंडे, बुद्धभूषण भारसाकडे, भीमराव गवई, सारंग दामोदर, शरद भारसाकडे, विनोद भारसाकडे, सुमेध भारसाकडे, तुकाराम चंदनशिव, श्रीकृष्ण बोदडे, अशोक अवचार, पांडुरंग बोदडे, वासुदेव बोदडे, सुरेश भोजने, अमृता बोदडे, इंदुबाई बोदडे, सना बोदडे, श्रावण बोदडे, मुकुंदराव बोदडे, पार्वताबाई खंडारे, निशिकांत सदार, रंजीत तायडे, वासुदेव सुरवाडे, आनंद अंभोरे यांच्यासह अतिक्रमणधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


