मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त (प्रशासन) अश्विनी भिडे यांची भेट घेऊन मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मान्सूनपूर्व तयारी, आरोग्य सुविधा, वाहतूक कोंडी, नाल्यांची साफसफाई आणि मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात आले.
या शिष्टमंडळात मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महिला प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा प्रदेश अध्यक्ष सागर गवई यांच्यासह दक्षिण मुंबई महासचिव समीर कांबळे, कमलेश उबाळे आणि विनय जाधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ईशान्य मुंबईतील राजावाडी रुग्णालय, अग्रवाल रुग्णालय तसेच पार्कसाईट परिसरातील रखडलेल्या रुग्णालय प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याशिवाय मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी, नाल्यांची नियमित साफसफाई आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मुंबई शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबणे, नाले तुंबणे, रस्त्यांवर खड्डे पडणे, झाडे कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यासाठी केलेल्या तयारीची माहिती देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यामध्ये शहरातील प्रमुख व लघु नाल्यांच्या गाळ काढण्याच्या कामाची सद्यस्थिती, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या जलनिस्सारण व्यवस्थेची साफसफाई व देखभाल, पूरप्रवण आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची यादी तसेच त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबत माहिती मागविण्यात आली. तसेच पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध असलेल्याß9 पंपिंग स्टेशन, डी-वॉटरिंग पंप आणि संबंधित यंत्रणांची माहितीही प्रशासनाकडे मागण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी चळवळ असल्याचे सांगितले. मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धारही शिष्टमंडळाने व्यक्त केला.





