नागपूर : नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी नागपूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध मागण्या मांडल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्यांचा समावेश आहे :
– आदिवासी वसतिगृहांमध्ये दर्जेदार मेस सुरू करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे भोजन उपलब्ध करून द्यावे.
– गडचिरोली येथे सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी.
– आदिवासी कोट्यातून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश किंवा लाभ घेणाऱ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत आणि आदिवासी आरक्षणाचा लाभ पात्र व मूळ आदिवासी समाजातील व्यक्तींनाच मिळावा.
– आदिवासी वसतिगृहांमध्ये सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दर्जेदार भोजन, बेड, स्वच्छ शौचालये यांसह आवश्यक सुविधांचा तातडीने आढावा घेऊन ऑडिट करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
– मागील वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कुंभमेळा आणि ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी एससी, एसटीच्या निधीचा वापर किंवा वळवणूक होत असल्यास त्याचे ऑडिट करण्यात यावे, तसेच एससी आणि एसटीचा निधी केवळ त्यांच्या विकासासाठीच वापरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
– एससी आणि एसटी विकासाचा निधी भविष्यात कोणत्याही कारणासाठी वळवला जाऊ नये, यासाठी कायदा करण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नागपूर शहर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





