तिवसा : सारसी येथील प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून माहुली जहागीर परिसरात वाद निर्माण झाला असून, प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतरही ग्रामपंचायतीचे लेटरहेड व शिक्के वापरून १५ सप्टेंबर रोजी ग्रामसभा बोलावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तिवसा तहसीलदारांनी या प्रकरणात स्थगिती दिलेली असताना ही ग्रामसभा घेणे बेकायदेशीर असल्याने ‘वंचित’ने ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज माहुली जहागीर पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. प्रशासकाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजीच संपलेला असताना त्यानंतर ग्रामपंचायतीच्या अधिकृत लेटरहेड व शिक्क्यांचा वापर करून ग्रामसभा बोलावणे नियमबाह्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सारसी येथील प्रवेशद्वाराच्या प्रश्नावर तिवसा तहसीलदारांनी स्थगिती आदेश दिलेला असतानाही ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘वंचित’ने केली आहे. या ग्रामसभेमुळे अल्पसंख्याक बौद्ध समूहाच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता असून, गावातील सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही संघटनेने दिला. गावातील परिस्थिती चिघळू नये यासाठी संबंधित ग्रामसभा तात्काळ रद्द करावी आणि नियमबाह्य प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली.
“सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही. ग्रामसभा रद्द न झाल्यास आरपारचा लढा उभारला जाईल,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.






