नांदेड : मौजे नरंगल, ता. नायगाव, जि. नांदेड येथील १९८४ पासून प्रलंबित असलेले प्लॉट वाटप तातडीने करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सन १९८४ मध्ये पुनर्वसन वस्तीवाढ गावठाण योजनेअंतर्गत गावातील नागरिकांच्या निवासासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचे गट/सर्वे क्रमांक ४/१, ४/८, ४/९ आणि २० असून, संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. जमीन संपादनानंतर संबंधित ७/१२ उताऱ्यावर शासनाचे नाव नोंदविण्यात आले. मात्र, तब्बल ४२ वर्षे उलटूनही पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे प्लॉट वाटप करण्यात आलेले नाही.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक पात्र नागरिक आजही निवासाच्या जागेपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शासनाच्या प्रचलित नियम व निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांना १० दिवसांच्या आत प्लॉटचे वाटप करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शंकर महाजन, रवी पंडित, संजय टिके, अमृत नरंगलकर, गणपत सवयी सोनकांबळे, गौतम डुमणे आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. तसेच शासनाच्या नावावर असलेल्या संबंधित जमिनीवर कोणाचे अनधिकृत अतिक्रमण किंवा कब्जा असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. ही मागणी एका दिवसाची नसून सन १९८४ पासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या हक्काची आहे. प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी, असे शंकर महाजन यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, १० दिवसांच्या आत प्लॉट वाटपाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित लाभार्थी व गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.






