मुंबई : आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाचा जोर वाढू लागला. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली.
परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या दुपारच्या सत्राला सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. (Mumbai Torrential Rains)
अंधेरी परिसरातील मोगरा नाला दुथडी भरून वाहत असून त्याला जोडणारे लहान नालेही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अंधेरी सबवे आणि परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, चेंबूरमधील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरीतील वीरा देसाई रोड, महानगरपालिका बाजारपेठ मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळीतील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी या मार्गांवरून प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





