मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दौऱ्यानंतर झालेल्या ‘शुद्धीकरणा’च्या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “जातीवाद आणि अस्पृश्यता संपली आहे असे कोण म्हणते? जातीवाद, अस्पृश्यता आणि मनूवादी मानसिकतेचे अशा प्रकारे निर्भयपणे केलेले प्रदर्शन हेच दाखवते की आजसुद्धा आरक्षण का गरजेचे आहे,” असे सिद्धार्थ मोकळे म्हणाले.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर मनूवाद्यांनी ‘शुद्धी हवन’ केले, वंचित बहुजन आघाडी या अत्यंत जातीवादी आणि मनूवादी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. एखाद्या दलित नेत्याने सार्वजनिक ठिकाणी संबोधित केल्यानंतर ते ठिकाण ‘शुद्ध’ केले पाहिजे ही विचारसरणी अस्पृश्यता आणि जातीवादाच्या घृणास्पद मानसिकतेवर आधारित आहे. अशा प्रथांमुळे दलितांना हीन दाखवण्याचा आणि त्यांची उपस्थिती ‘दूषित’ मानण्याच्या मागासलेपणाला खतपाणी मिळते.
भारतीय संविधानाच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्यात आली असून, कायद्यानुसार जातीय भेदभाव व बहिष्कारावर बंदी आहे. तरीही अशा घटना उघडपणे घडणे हे भारतीय समाजात आजही जातीवाद खोलवर रुजलेला असल्याचे दर्शवते. या जातीयवादी कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांवर उत्तराखंडच्या भाजप सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही घटना भाजपची दलितविरोधी मानसिकता उघड करते, त्यामुळे भाजपने तात्काळ दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच, काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी आपल्याच पक्षाध्यक्षांच्या विरोधात झालेल्या या जातीयवादी घटनेकडे दुर्लक्ष करणार नाहीत, अशी अपेक्षाही सिद्धार्थ मोकळे यांनी व्यक्त केली.





