नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांमुळे शेतकरी व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
पवनचक्की प्रकल्पांमुळे ध्वनीप्रदूषण, धुळीचे प्रदूषण, पर्यावरणीय परिणाम तसेच जड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे शेती, पिके आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.
संबंधित गावांमधील पवनचक्की प्रकल्पांची तात्काळ चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व कामांना स्थगिती द्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना योग्य व न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पवनचक्की कंपन्यांच्या करारांची व परवानग्यांची कायदेशीर तपासणी करावी, प्रकल्पांच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि निष्पक्ष अहवाल तयार करावा, तसेच तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय विशेष समिती गठित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भविष्यात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी संबंधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करून शेतकरी व ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या उपोषणात पावबा आखाडे, अजय निकुंभे आणि देवबा पिंपळे सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे.





