नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितचे नागपूर जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी आदिवासी विकास विभाग, नागपूरचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.
दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री जपतलाई येथील आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य व सुरक्षेची जबाबदारी शासनाची असताना आश्रमशाळेतील कथित निष्काळजीपणामुळे अशी घटना घडणे गंभीर व निंदनीय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल १५ दिवसांत सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या शालेय अधिकारी, कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक आणि संस्था संचालक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
मृत्यू झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी वंचितने केली आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि निवासाच्या सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने १५ दिवसांच्या आत या मागण्यांवर ठोस कार्यवाही केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजय सहारे यांनी दिला. यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आय.टी. सेल प्रमुख शुभम वाहने आणि अनिल नांदूरकर उपस्थित होते.






