पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भोंगळ कारभारावर आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवरून सध्या राज्यभरातील परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींचे भविष्य या भ्रष्ट व्यवस्थेमुळे अंधारात सापडले असून विद्यार्थ्यांचा प्रशासनावरील विश्वास पार उडाला आहे. या पार्श्वभूमीवर MPSC परीक्षार्थींच्या या हक्काच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने (VBA) खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीच्या कारभाराविरोधात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने आपला पूर्ण आणि जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजेंद्र पातोडे यांनी म्हटले की,”MPSC मधील सावळागोंधळ आणि भ्रष्टाचाराने मेहनती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांचा आवाज आता शासन किंवा प्रशासन दाबू शकत नाही,” असा सणसणीत इशारा पातोडे यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे, पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि MPSC विद्यार्थ्यांनी निघणाऱ्या या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे.






