भेंडीला दोन रुपये किलो भाव
अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत अवघ्या २४ तासांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, पावसातील खंड आणि वाढती कर्जफेडीची चिंता या पार्श्वभूमीवर या घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
आत्महत्या केलेल्यांमध्ये नामदेव रामचंद्र तायडे (७०, दर्याबाद), गजानन विनायक काळमेघ (७०, धामणगाव रेल्वे), दिनेश नारायण राऊत (४५, खेडपिंपरी, ता. नांदगावखंडेश्वर), आनंदराव राजाराम खाडे (८५, कामरगाव) आणि विष्णू सदानंद मेटकर (२३, नगरवाडी, ता. महागाव) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव तायडे यांनी शेतीसाठी पीककर्ज घेतले होते. पत्नीच्या नावावरही शेतीसाठी कर्ज असल्याचे सांगितले जाते. पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पिकांच्या उत्पन्नाबाबतची चिंता वाढली होती. त्यातून त्यांनी घरात कीटकनाशक प्राशन केले. गजानन काळमेघ यांनीही नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.
दरम्यान, दिनेश राऊत यांनी सातेफळ फाट्याजवळील ढाब्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. तर आनंदराव खाडे हे कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने नाराज होते. त्यातच पावसातील खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटलेले कापसाचे उत्पादन, अत्यल्प पाऊस आणि कर्जबाजारीपणामुळे शनिवारी विष्णू मेटकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
भेंडीला दोन रुपये किलो भाव; शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले पीक
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे आणखी एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. जळू येथील शेतकरी चंद्रसिंग शांताराम पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात मोठ्या आशेने भेंडीची लागवड केली होती. मशागत, नांगरणी, रोटाव्हेटर, बियाणे, लागवड, रासायनिक खते, कीटकनाशकांची फवारणी, निंदणी, तोडणी मजुरी आणि वाहतूक यासाठी आतापर्यंत सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये खर्च झाला.
या पिकातून सुमारे ७० क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र कासोदा बाजारात व्यापाऱ्यांकडून भेंडीला अवघा दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने पाटील हवालदिल झाले. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही बाजारभाव मिळत नसल्याने संतापलेल्या पाटील यांनी विक्रीसाठी आणलेली संपूर्ण भेंडी रस्त्यावर फेकून देत आपला रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून राज्य सरकारवरही टीकेची झोड उठली आहे. एकीकडे विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. कर्जबाजारीपणा, पीकविमा, हमीभाव, नापिकी, सिंचन आणि शेतीमालाला योग्य बाजारभाव या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या आर्थिक अडचणींच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने (VBA) वेळोवेळी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना, शेतीमालाला योग्य भाव, पीकविमा आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी सातत्याने मांडत आली आहे. विदर्भात अवघ्या २४ तासांत पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.





