मोदींनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला
पुणे : “ट्रम्प यांच्या तालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा नाचताना दिसत आहेत. मोदी सरकारने अमेरिकन कृषी उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणण्यास सहमती दर्शवली असून, याचे भारतीय शेती आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर दूरगामी आणि विनाशकारी परिणाम होणार आहेत,” अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबीओ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये भारत पुढील पाच वर्षांत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची उत्पादने खरेदी करणार असल्याचा उल्लेख केला आहे. याच संदर्भाने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
भारतीय शेतकरी आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे, हमीभाव (MSP) न मिळाल्यामुळे, निर्यात घटल्यामुळे आणि आर्थिक अस्थिरतेमुळे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय शेतकरी अमेरिकेतील प्रचंड अनुदानित कृषी उद्योगांशी स्पर्धा करू शकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या दशकात ३७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, दुष्काळ, वाढते खर्च आणि अनिश्चिततेमुळे आत्महत्या केल्या आहेत. नुकत्याच निर्माण झालेल्या इंधनटंचाईमुळे डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, पावसाळ्यापूर्वीची महत्त्वाची शेतीकामे ठप्प झाली आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी केवळ ५० पैसे प्रति किलो दर दिला जात आहे, तर उत्पादन खर्च किमान २२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
“अशा भीषण कृषी संकटाच्या काळात मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना गुलाम बनवले होते. आज मोदी यांनी त्यांचे भविष्य अमेरिकेच्या हातात विकले आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “मोदी तडजोडीच्या राजकारणात अडकले आहेत. आपला देश पुन्हा एका परकीय शक्तीच्या गुलामीच्या उंबरठ्यावर उभा आहे,” असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.





