दर्यापूर (अमरावती) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी (दि. २३ जुलै) दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला दर्यापूर शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान व्यापारी व नागरिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अमरावती पश्चिम जिल्हा प्रमुख संजय चौरपगार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा उल्लेख करत, “न्याय, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेला कथित लाठीचार्ज हा लोकशाहीवरील आघात असून हा लोकशाहीचा अपमान नाही का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.




