पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (दि. २५) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी NEET आंदोलनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडत विद्यार्थ्यांना आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचे आवाहन केले. जंतर-मंतर हे आंदोलनाचे केंद्र राहील, मात्र देशभरातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आंदोलनाची ‘सब-सेंटर्स’ उभारून खासदारांवर लोकशाही मार्गाने दबाव आणावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आंबेडकर म्हणाले की, ज्यांना दिल्लीला जाता येणार नाही अशा विद्यार्थ्यांनी आपल्या मतदारसंघातील निवडून आलेल्या खासदारांना निवेदन द्यावे. संसदेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे आवाहन त्यांना करावे. जर खासदारांनी ही मागणी केली नाही, तर त्यांच्या निवास स्थानासमोर शांततापूर्ण निदर्शने सुरू करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी द्यावा.
ते म्हणाले की, “मतदारांप्रती खासदारांची बांधिलकी प्रथम असली पाहिजे, पक्षाप्रती नंतर. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी.” ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांनाही आवाहन करत बिहार विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात शोध पत्रकारिता करण्याची गरज व्यक्त केली. “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही, याचा शोध पत्रकारांनी घ्यावा,” असे ते म्हणाले.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांनी उपोषण सोडून आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे आंदोलनात कोणताही फूट पडलेला नाही. उलट आता संपूर्ण आंदोलनाचा केंद्रबिंदू शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आला आहे. विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी नेतृत्व यांनी एकत्र बसून आंदोलनाचा पुढील आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वांनी स्वतंत्र कार्यक्रम करण्यापेक्षा एकसंध रणनीती आखल्यास आंदोलन अधिक प्रभावी ठरेल, असे ते म्हणाले.
सरकारवर टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार गंभीरपणे पाहत नसल्याचे दिसते. केवळ काही अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितले की, विद्यार्थी, नागरिक आणि विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न जनतेने गांभीर्याने घेतल्यामुळेच बंदला मोठा प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, सध्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असून, इतर कोणत्याही विषयाकडे लक्ष विचलित न करता हा लढा पुढे नेण्याची गरज आहे.





