उमरखेड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उमरखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.
जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर आणि तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ, महागाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपुरा, सराफा लाईन, नाग चौक, नांदेड रोड आणि माहेश्वरी चौक या मार्गांवरून रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात विश्वास धुळे, भारतीय बौद्ध महासभेचे धम्मदीप काळबांडे, तालुकाध्यक्ष जी. एन. कांबळे, समता सैनिक दलाचे राजेसाहेब पंडित, रिटायर कर्मचारी असोसिएशनचे यशवंत काळबांडे, राजेश घुगरे, सिद्धार्थ धोंगडे, संतोष गायकवाड, सचिन खंदारे, गजानन भालेराव, एस. के. मुनेश्वर, गोपीनाथ नरवाडे, योगेश गायकवाड, गणेशराव कोकणे, सारीपुत वाहुळे, बाबुराव नवसागरे, अरविंद धोंगडे, पंकज धोंगडे, शीलरत्न जाधव, राहुल लोमटे, चंद्रकांत पंडित, राजाराम काकडे, धम्मदीप पाईकराव, सैनिक देवानंद पाईकराव, कमलबाई मुनेश्वर, जिजाबाई खंदारे, बर्डे ताई, खंदारे ताई, धुळे ताई यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



