– कुलदीप कोटंबे
हिंदू विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध सवर्ण असे समाजामध्ये जे पूर्वीपासून असलेले संघर्ष आढळून यायचे, त्यापेक्षा नवनवीन संघर्ष गेल्या दहा वर्षांत देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगावमध्ये मराठा विरुद्ध दलित हा संघर्ष, गेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष असे संघर्ष दिसले; पण सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक वेगळा संघर्ष दिसत आहे आणि तो फार टोकाचा झालेला आहे, तो म्हणजे बौद्ध विरुद्ध बौद्धेतर दलित हा संघर्ष. मराठवाड्यामध्ये झालेल्या नामांत आंदोलनाच्या वेळी एकदिलाने, एकसंधपणे असलेला संपूर्ण दलित समाज असा का विभागला?
आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन काही बौद्धेतर मंडळी मला सांगत असतात की बौद्ध लोकांमुळेच आपली मुलं आयएएस, आयपीएस बनत नाहीत; कारण त्यांना बौद्ध लोक पुढे येऊ देत नाहीत. मुलाखतीपर्यंत आपली मुलं पोहोचतात; परंतु तिथे बौद्ध मंडळी आपल्या मुलांना पुढे जाऊ देत नाहीत. आता हा त्यांचा युक्तिवाद कुठून आला? त्याला काय लॉजिक आहे? हे त्यांना सांगता येत नाही. ज्या माणसांनी संघ लोकसेवा आयोगाची मुलाखत दिली आहे, त्या सगळ्यांना हे माहीत असतं की इंटरव्ह्यू पॅनलमध्ये संपूर्ण भारतातून लोक आलेले असतात. तिथे फक्त महाराष्ट्रातील बौद्ध आणि बौद्धेतर दलित अशी स्पर्धा नसते. परंतु हे लॉजिक किंवा अशा प्रकारची मांडणी की बौद्धांमुळेच बौद्धेतर दलित पुढे जात नाहीत, ही मांडणी पाच ते सहा वर्षांपासून होत आहे. अशी कुठल्याही आधार नसलेली मांडणी बौद्धेतर दलित समाजातील काही संघटना आणि त्या संघटनांचे कार्यकर्ते तावातावाने करत आहेत. याला उत्तर म्हणून अर्थातच बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांकडून त्याच तडफेने उत्तर दिलं जात आहे.
बौद्धेतर दलित कसे देवाच्या मागे आहेत, कसे देवांमध्ये गुरफटून गेलेले आहेत, ते हिंदू धर्म कसा सोडू शकत नाहीत अशा प्रकारची नेहमीपासून चालत आलेली मांडणी ते करतात. पण बौद्धेतर दलितांमध्ये आपला शत्रू म्हणजे बौद्ध समाज, अशा प्रकारचे विषवल्ली कुठून आलेली आहे? आणि ती गेल्या दहा वर्षांमध्येच फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली मांडणी जेव्हा येते, तेव्हा त्या मागे कोण असतं? बौद्ध आणि बौद्धेतर दलितांना भांडण लावून कोण याचा फायदा घेत आहे, हे सूर्यप्रकाशातल्यासारखं स्पष्ट आहे. बौद्धेतर दलितातील अनेक तरुणांना हे काय चाललंय हे समजत आहे. हे तरुण मंडळी जमेल त्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आंबेडकरवाद जोपासत आहेत; परंतु नेमका वाद काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
बौद्धेतर दलितांवर फार पूर्वीपासून होत असलेला आरोप म्हणजे ते देवी-देवता सोडण्यास तयार नाहीत; ते हिंदू धर्माची गुलामी सोडण्यास तयार नाहीत किंवा बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, परंतु ते बाबासाहेबांना मानत नाहीत. आता यामध्ये अर्धसत्य आहे. बौद्धेतर दलित मग तो कितीही वाया गेलेला असला किंवा अगदी दारू पिणारा मनुष्य असला, तरीही तो बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांचा आदर करतो. उत्तर भारतामध्ये अनेक जातीसमूह आहेत, जे बाबासाहेबांना सर्वार्थाने मानतात. महाराष्ट्रात मात्र बौद्ध वगळता बाबासाहेबांचं नाव कुणी घेत नाही. ओबीसीमधील फार थोडे अपवाद सोडले, तर ओबीसी बांधवसुद्धा बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत. घरात फोटो लावणे ही तर दूरची गोष्ट.
महाराष्ट्रामध्ये बौद्धांशिवाय बाबासाहेबांचं नाव अभिमानाने घेणारा एकमेव समूह म्हणजे बौद्धेतर दलित. ते बौद्धांइतके कट्टर नसतात किंवा ते चारचौघांसमोर किंवा घरामध्ये बाबासाहेबांचे फोटो लावत नाहीत; परंतु बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये अतोनात आदर असतो. हे सहज अनुभवता येतं. त्यांना सुद्धा बाबासाहेबांविषयी प्रचंड अभिमान असतो. वादाची सुरुवात इथून होते की बौद्धेतर दलित हिंदू देवी-देवतांची पूजा करतात आणि ते बौद्ध समाजासारखं उघडपणे जयंती साजरी करत नाहीत. जयंतीमध्ये फारसे सहभागी होत नाहीत, देवी-देवता सोडत नाहीत, कर्मकांड सोडत नाहीत. याचाच बौद्ध समाजाला राग येतो आणि बौद्ध समाज तो वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करतो. ओबीसी बांधवांचा किंवा उच्चवर्णीयांचा बौद्ध समाजाला फारसा राग येत नाही; परंतु बौद्धेतर दलित समाजाचा मात्र सात्विक संताप येतो. याचं कारणही उघड आहे आणि ते न्याय्य आहे.
ज्या समाजाने आपल्यासारखेच अस्पृश्यतेचे चटके भोगले आणि ज्या समाजाला आज बाबासाहेबांमुळे मानवी अधिकार मिळाले आहेत, तो समाज बाबासाहेबांचे विचार का अमलात आणत नाही, असं बौद्ध समाजाला वाटतं. सगळ्यात जवळचा असल्यामुळे सगळ्यात जास्त राग येतो. त्यांनी बौद्ध चळवळीत यावं, आंबेडकरवादी चळवळीत यावं, असंही वाटतं. आणि त्यामुळेच बौद्ध समाज तीव्रपणे सांगत आलेला आहे की तुम्ही देवी-देवता सोडा आणि आंबेडकर चळवळीत या.
पूर्वीपासूनच बौद्धेतर दलित समाज हा बौद्ध समाजाला दोष देतो की बौद्धांनी बाबासाहेबांना फक्त आपल्या पुरते सीमित करून ठेवले; त्यांनी बाबासाहेबांना इतर समाजाला स्वीकारूच दिलं नाही. आम्हाला बाबासाहेबांचा आदर्श आहे; परंतु बौद्ध मंडळी आम्हाला आवडत नाहीत, म्हणून आम्ही चळवळीत येत नाही, आम्ही कार्यक्रमात येत नाही. फार पूर्वीपासून हा वाद दिसतो; परंतु सध्या हा संघर्ष टोकाला गेला आहे.
“आम्हाला काही झालं तरी आंबेडकर चळवळीत यायचंच नाही; आमचं सगळं वाईट बौद्धांमुळे झालं आहे,” असा एक नवीन मतप्रवाह तयार करण्यात उजव्या मंडळींना यश आलं आहे. याची तीव्र प्रतिक्रिया म्हणून “तुम्हाला चळवळीत घेणारच नाही; तुमची लायकीच गुलामी करण्याची आहे,” अशा प्रतिक्रिया काही कडव्या बौद्धांकडून येत आहेत.
हा संघर्ष गेल्या दहा वर्षांत दिसत असला, तरी याची पायाभरणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मराठवाड्यामध्ये, विशेषतः लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये संघांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जमिनीवर प्रचंड काम केलं आहे. बौद्धेतर दलितांमध्ये घरोघरी जाऊन या लोकांनी त्यांना शाखांमध्ये, विविध उपक्रमांमध्ये गुंतवून घेतलं. त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये बौद्धेतर दलित मुलांना प्रवेश दिला आणि लहानपणापासून हिंदुत्ववादी विचारसरणी रुजवली.
बौद्धेतर समाजामध्ये अशी मानसिकता तयार करण्यात उजव्या संघटनांना का यश आलं? यासाठी माझ्या लहानपणच्या दोन घटना आठवतात.
पहिली घटना, बौद्धेतर दलित समूहातील अनेक मंडळी वारकरी असतात. ते हरिनाम सप्ताहात भजन म्हणायला जातात; पण बुक्का लावण्याच्या वेळी त्यांना स्पर्श केला जात नाही, हातावर वरून टाकला जातो. काहींना याचा राग आला आणि त्यांनी स्वतंत्र भजनी मंडळ तयार केलं. पण काही दिवसांनी पुन्हा तेच जुने प्रकार सुरू झाले. बुक्का वरून घेणे, शेवटी जेवायला बोलावणे इत्यादी.
दुसरी घटना गावात महादेव मंदिर बांधण्यात आले. बौद्धेतर दलितांनी मोठ्या प्रमाणावर देणगी दिली; पण प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांचा अपमान झाला त्यांना मंडपात न बसवता वरून नारळ टाकले गेले. काही महिलांना हा अपमान सहन झाला नाही; तरीही समाजाने मंदिर सोडलं नाही.
या घटनांनंतरही त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही. आणि त्यामुळेच या समाजाचा वापर उजव्या संघटनांनी सहज केला.
गेल्या काही वर्षांत बौद्धेतर दलित समाजात जागृतीही होत आहे. शिक्षित तरुण आंबेडकरवाद स्वीकारत आहेत; सत्यशोधक पद्धतीने विवाह होत आहेत. पण त्याचवेळी प्रतिगामी गटही वाढत आहेत. लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांच्या नावावरून समाजात विभागणी केली जात आहे. त्यांच्या खऱ्या विचारांचा प्रसार होत नाही.
काही अशिक्षित मंडळी सोशल मीडियावर अर्वाच्य भाषा वापरतात; तर काही सुशिक्षित लोक स्वार्थासाठी त्यांना साथ देतात. त्यामुळे समाजाची अधोगती होत आहे. दलित ऐक्य होऊ न देणं हा उजव्या संघटनांचा मोठा डाव आहे. तो रोखण्यासाठी बौद्ध आणि बौद्धेतर दोघांनीही जबाबदारी घ्यावी. दोष काढण्यापेक्षा विचार पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
बौद्ध समाजाने सांगण्याची पद्धत बदलावी, आणि बौद्धेतर समाजाने आंबेडकरवाद स्वीकारावा. सध्या सर्वात मोठं काम म्हणजे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे. त्या विचारांमध्ये इतकी ताकद आहे की अंधश्रद्धा आपोआप दूर होतील. सकारात्मक दृष्टिकोनाने दोन्ही समाजातील प्रगल्भ विचारवंतांनी काम केलं, तर बौद्ध आणि बौद्धेतर दलितांमधील हा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो.






