सांगली : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने मूल्यांकनाच्या नावाखाली नागरिकांवर तिप्पटपेक्षा अधिक घरपट्टी वाढ लादल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य (सांगली जिल्हा) यांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असताना महापालिकेने करवाढ लादून जनतेच्या अडचणी अधिक वाढवल्या आहेत. तसेच नागरिकांना दिलासा देण्याऐवजी प्रशासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
यावेळी संघटनेने अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय असताना घरपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. तसेच मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांच्या हरकतींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांनी या प्रश्नावर मौन बाळगून प्रशासनाला अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
“जनतेचा पैसा लुटण्यासाठी नव्हे, तर विकासासाठी असतो. सुविधा शून्य आणि कर मात्र तिप्पट, हा सरळसरळ अन्याय आहे,” असा सवाल उपस्थित करत संघटनेने वाढीव घरपट्टी आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच यावेळी संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेतला नाही तर प्रशासनाविरोधात कायदेशीर लढा उभारण्यात येईल. तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. परिस्थिती चिघळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, चेतना नागवंशी, संगिता शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष किशोर आढाव, कोषाध्यक्ष हिरामण भगत, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी (पवन) वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, महासचिव नविनकुमार कांबळे, मिरज तालुका उपाध्यक्ष प्रमोद मल्लाडे, मानतेश कांबळे, दिपक कांबळे, शंकर ऐवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “जनतेच्या हक्कासाठीचा लढा सुरूच राहील. अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली.





