कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. पालकमंत्र्यांनी केवळ ध्वजारोहणापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, आंदोलन होण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी “सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, सामान्य नागरिक तसेच रस्ते, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस योगदान काय, असा सवालही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली, हे समजू शकते; मात्र त्याच प्रशासनाने पालकमंत्र्यांचे लक्ष जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे वेधणे अधिक लोकहिताचे ठरेल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना जवळपास तीन तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद अस्लम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, सुशील वाढवे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहणार,” असा निर्धार वंचित बहुजन युवा आघाडी, कळमनुरी तालुका, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.





