मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता फक्त 45 दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवले जाणार आहे. आयोगाने मोठा निर्णय घेत निवडणूकीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो 45 दिवसात डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय लोकशाही, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासाच्या विरोधात असल्याचा त्यांनी म्हटले आहे.प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले की, “मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे ही जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने पारदर्शकतेच्या विरोधात पाऊल उचलणे हा गंभीर चिंतेचा विषय आहे.
“डिसेंबर २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक नियम १९६१ मध्ये केलेल्या सुधारणेमुळे अनेक निवडणूक संबंधित नोंदींवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांना पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ७५,९७,०६७ मतांची संध्याकाळी 5 नंतर झालेली वाढ व सुधारित नियमावलीबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या सूचनांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ॲड. आंबेडकर यांनी सूचित केले की, “आज त्या सर्व शंका पुन्हा समोर येत आहेत.”दरम्यान, विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या मतदानाच्या संदर्भात चेतन चंद्रकांत अहिरे विरुद्ध भारतीय संघ व इतर या सुरू असलेल्या केसची महत्त्वपूर्ण पुढील सुनावणी सोमवार, २३ जून २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. याप्रकरणी याआधी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला न्यायालयात उत्तर द्यायला सांगितले होते.