गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहोचली असून पाच जिल्ह्यांतील ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत चराईदेव जिल्ह्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढला आहे.
पूराचा सर्वाधिक फटका चराईदेव जिल्ह्याला बसला असून येथे सुमारे १.९ लाख नागरिक बाधित झाले आहेत. शिवसागरमध्ये १.५ लाखांहून अधिक, तर जोरहाटमध्ये सुमारे १.४ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मात्र, शनिवारी सहा जिल्ह्यांतील सुमारे ६.५५ लाख नागरिक बाधित होते, त्या तुलनेत आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने चार जिल्ह्यांमध्ये ३५४ निवारा छावण्या आणि मदत वितरण केंद्र सुरू केले आहेत. या छावण्यांमध्ये आतापर्यंत ३७,७२४ बेघर नागरिकांना सुरक्षित आश्रय देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), अग्निशमन व आपत्कालीन सेवा तसेच पोलीस यंत्रणा बचाव आणि मदतकार्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
राज्यातील ७६३ गावे अद्यापही पुराच्या पाण्याखाली असून ४८,७४२.०९ हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली असल्याची माहिती ASDMA ने दिली आहे.
याशिवाय, नुमालीगड परिसरातील धनसीरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पूराचा धोका कायम आहे. या नैसर्गिक आपत्तीचा पशुधनावरही मोठा परिणाम झाला असून सुमारे ८८,२४० जनावरे आणि कुक्कुटपालन बाधित झाले आहे.




