मुंबई : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या भरती प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनेही तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती. तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप करण्यात आला असून गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्येही विसंगती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीतील तथ्यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Also Read : युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित
याच मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत भाजपा महायुती सरकारवर टीका केली आहे. NEET, TET, राजस्थानमधील पॅरामेडिकल परीक्षा, उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटी परीक्षा आणि आता MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी अशा घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने दोन उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रारीची आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची तत्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये आणि पेपरफुटीच्या घटनांवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पक्षाने केली आहे. भाजपा महायुती सरकारने विद्यार्थी आणि जनतेसमोर पेपरफुटीच्या घटनांना आळा बसणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आपल्या पोस्टद्वारे केली आहे.



