रेणापूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते, भारिप बहुजन महासंघाचे रेणापूर तालुक्याचे पहिले अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माजी कर्मचारी उत्तम शंकरराव आचार्य यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.
उत्तम आचार्य हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू, प्रामाणिक आणि खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. १९९२ मध्ये रेणापूर तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांना भारिप बहुजन महासंघाच्या पहिल्या रेणापूर तालुका अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. तसेच आंबेडकरी विचारधारा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीप्रती त्यांची निष्ठा अतूट होती. त्यांनी पक्ष संघटना उभारण्यासाठी खेडोपाडी पायी फिरून जनजागृती केली.
घरातील सोने गहाण ठेवून तसेच नोकरीतील पगारातील मोठा हिस्सा चळवळीच्या कार्यासाठी खर्च केला. आचार्य यांनी समाजकारणाला प्राधान्य देत रेणापूर तालुक्यात आंबेडकरी विचार घराघरात पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. आचार्य यांच्या प्रयत्नांमुळेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे पानगाव नगरीशी जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्याचे पहिले आदिवासी आमदार भीमराव केराम यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम पानगाव येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. तसेच त्यांच्या नेतृत्वात रेणापूर तालुक्यात भारिप बहुजन महासंघाची मजबूत संघटनात्मक फळी उभी राहिली.
त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आजही रेणापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी खंबीरपणे कार्यरत आहेत. उत्तम शंकरराव आचार्य यांच्या निधनाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित, निष्ठावान आणि संघर्षशील नेतृत्व हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.






