उस्मानाबाद : परंडा शहर व तालुक्यात वीज ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत स्मार्ट मीटर तातडीने काढून त्याठिकाणी जुने मीटर किंवा साधे डिजिटल मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी एम.एस.ई.बी.चे अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने एम.एस.ई.बी. परंडा येथील उपकार्यकारी अभियंता एस. एस. पवार यांची भेट घेऊन ग्राहकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी शहर व तालुक्यातील अनेक ग्राहकांना कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना न देता सुरू स्थितीतील जुने मीटर काढून त्यांच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वीज बिले येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही ग्राहकांना पूर्वीच्या बिलाच्या तुलनेत तिप्पट-चौपट रकमेची बिले येत असल्याने ग्राहकांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा तसेच मीटरच्या अचूकतेबाबत संभ्रम असल्याचा दावा वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून त्याठिकाणी जुने मीटर अथवा त्याच धर्तीवरील साधे डिजिटल मीटर बसविण्यात यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली. ग्राहकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या मागणीवर त्वरित कार्यवाही न झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, फुले-आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, मोहनदादा बनसोडे, मधुकर सुरवसे, तुकाराम चौतमहाल, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते.





