कल्याण : कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक (Clerk) पदाच्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेदरम्यान सर्व्हर फेल होणे तसेच संगणकांमध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, परीक्षा केंद्रावरील कथित गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यात आल्या. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब देखील विचारण्यात आला.
परीक्षेतील तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. तसेच, प्रभावित विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






