कल्याण : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरात घडलेल्या विवाहित मुलीच्या हत्येप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिस तपासात या हत्येमागील कारण म्हणून मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध केलेला आंतरजातीय प्रेमविवाह असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी आपल्या मुलगी गायत्री वसईकर हिची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गायत्री विवाहानंतर काही दिवसांसाठी माहेरी आली असताना ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी वडील घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी विनोद वसईकर यांना अखेर ताब्यात घेतले.
Also Read : लाडकी बहीण योजनेचे चार महिन्यांचे हप्ते रखडले; लाखो महिलांमध्ये नाराजी, 80 लाख लाभार्थी अपात्र
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. गायत्रीने कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. यापूर्वी तिच्यासाठी दोन वेळा साखरपुड्याची तयारी करण्यात आली होती; मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारून स्वतःच्या पसंतीने विवाह केला होता.
Also Read :विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांनी घेतली भेट
घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात विवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. चौकशीदरम्यान मुलीच्या आंतरजातीय विवाहाविषयीच्या नाराजीतूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.






