ठाणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात पक्षविस्ताराला वेग आला आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात विविध राजकीय पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांतील कार्यकर्त्यांसह मुस्लिम, तेली, वडार आणि इतर बहुजन समाजातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून विविध समाजघटक पक्षाच्या प्रवाहात सहभागी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पांडू पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘गाव तिथे शाखा’ मोहीम जिल्ह्यात वेगाने राबविण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. आगामी काळात मोठ्या संख्येने बहुजन समाजातील नागरिक पक्षात प्रवेश करतील आणि ठाणे जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून संघटन उभारण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात ठाणे जिल्ह्यात पक्षविस्ताराची मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेतही देण्यात आले.






