कोल्हापूर : विविध जनहिताच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी इचलकरंजी येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या विविध धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला.
यावेळी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
महावितरणकडून सक्तीने बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर योजनाही जनविरोधी असल्याचा आरोप करत ती तात्काळ थांबविण्याची मागणी आंदोलकांनी केली. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीचा “लाडकी बहीण” योजनेसाठी वापर केल्याबद्दलही तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जामने तसेच शिरोळ तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शासनाने जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.





