हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या वसमत तालुका नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. माजी तालुका अध्यक्ष उत्तम करवंदे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक रमेश भुजबळ यांनी प्रास्ताविक करत पक्षाची भूमिका आणि आगामी संघटनात्मक वाटचाल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच युवा नेते रुपेश भैय्या कदम यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती.
यावेळी तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मीकांत स्वामी (तालुका अध्यक्ष), शिलरत्न खंदारे (महासचिव), प्रविण बारहाते, अभिजित आर्वीकर, ग्यानोजी खरवडे व पठाण इरशाद खान (उपाध्यक्ष), भिमराव सरोदे (संघटक), राजरत्न गायकवाड (प्रसिद्धी प्रमुख) तसेच बाळासाहेब कांबळे, पंकज कसबे, सिद्धार्थ मोरे आणि शेख रफिक शेख सुलेमान (सचिव) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. महासचिव शिलरत्न खंदारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण पायाला भिंगरी बांधून, ऊन-पाण्याची पर्वा न करता प्रत्येक गाव, तांडा आणि वाड्यावर पक्षाची ‘गाव तिथे शाखा’ उभी करू. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी नूतन कार्यकारिणी अहोरात्र परिश्रम घेईल.”
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी संघटनात्मक विस्तारावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामाजिक परिवर्तन आणि बहुजन हिताच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.






