नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान विधी अधिकारी अभय जाधव यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर कारवाई जातीवादी मानसिकतेतून करण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महासभेत अभय जाधव यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर अन्यायकारक व जातीवादी दृष्टिकोनातून कारवाई झाल्याचा आरोप करत आयुक्तांची भेट घेण्यात आली.
यावेळी आयुक्त कैलास शिंदे यांनी महासभेत मंजूर झालेला निलंबनाचा ठराव अद्याप त्यांच्याकडे प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित ठराव आयुक्तांकडे आल्यानंतर त्यावर नियमानुसार विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. महानगरपालिकेच्या महासभेत विशेष चर्चा घडवून आणत येत्या १५ दिवसांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वतः पुतळा उभारण्यात येईल, असा इशारा आयुक्तांना देण्यात आला.
या वेळी जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष दीपक बाणाईत, उपाध्यक्षा सुरेखा वानखेडे, सचिव कविता हिवाळे, संदेश हत्तरगे, पल्लवी शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.






