उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-सभासद नोंदणी अभियानाला ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे भव्य सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.
या अभियानासाठी आकर्षक टेंट उभारून नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. वसाहतींमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केली. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक भगिनींनी उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीचे सभासदत्व स्वीकारले.
याशिवाय युवक आणि पुरुषांनीही अभियानाला मोठा पाठिंबा दर्शवत परिवर्तनाच्या विचारांवर विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि अथक परिश्रमामुळे संपूर्ण अभियानाला उत्सवी वातावरण लाभले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी ठाणे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी अशा सभासद नोंदणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
राज्यभर सुरू असलेल्या महा-सभासद नोंदणी अभियानामुळे वंचित बहुजन आघाडीच्या संघटन विस्ताराला गती मिळत असून, ठाणे जिल्ह्यात या अभियानाला मिळालेला प्रतिसाद परिवर्तनाच्या राजकारणाला बळ देणारा असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


