नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच भटक्या जनावरांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता यांसह अनेक समस्या निदर्शनास आल्या. या परिस्थितीमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी समोर आले. तेथील परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, परिसरातील मूलभूत सोयी-सुविधा अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे पाहणीतून दिसून आले.
Also Read : अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?
या समस्यांची पाहणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रशासन नेमके कोणासाठी काम करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
परिसरातील या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात आल्या नाहीत, तर घणसोली वॉर्ड कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिला. यावेळी ऐरोली तालुका सचिव आकाश भारदे, रबाळे विभाग उपाध्यक्ष राजाराम गाडे, लक्ष्मण सूर्यवंशी, पिराजी दांडगे, अंकुश तेलंगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली.





