नांदेड : नांदेड जिल्ह्यात पिवळी घिराणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जलकुंभामधून अनेक दिवसांपासून होत असलेल्या गळतीमुळे आणि नागरिकांना गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जलकुंभाची अनेक वर्षांपासून सखोल साफसफाई करण्यात आलेली नाही. नियमानुसार दर सहा महिन्यांनी जलकुंभाची स्वच्छता करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून विविध साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
वंचित बहुजन आघाडीने जलकुंभातील गळती तात्काळ बंद करून आवश्यक दुरुस्ती करावी, जलकुंभाची सखोल साफसफाई करून शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक ॲड. बिलास शेख, शुक्लोधन गायकवाड, स्थायी समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडी युवकचे महानगर अध्यक्ष राहुल मधुकरराव सोनसळे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



