लातूर : रेणापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पानगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आजही रस्ते, गटारी, पाणी आदी मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर हालगी बजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीत गावाच्या विकासाचा गाजावाजा करत सर्व राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन २०-२० महिन्यांच्या सत्तावाटपाच्या सूत्रावर निवडणूक बिनविरोध केली. प्रत्येक २० महिन्यांनी सरपंच व उपसरपंच बदलल्याने प्रशासन, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात कोणताही ताळमेळ राहिला नाही. तसेच या भागाच्या सत्ताधारी आमदाराने गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पानगाव रस्ते, गटारी आणि पाणी यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
१) गावातील गटारे गाळाने तुडुंब भरलेली असून प्रत्येक पावसाळ्यात गटारांतील गाळ रस्त्यावर वाहून येतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन विविध आजारांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्यापूर्वी गटारांतील गाळ काढण्यात यावा.
२) दलित वस्ती वार्ड क्र. ६ (डॉ. आंबेडकर नगर) मधील अपूर्ण राहिलेल्या गटाराचे बांधकाम आणि रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात यावे.
३) वार्ड क्र. ६ मधील (डॉ. आंबेडकर अस्थी कलशाशेजारी) सभागृहाची लाईट व्यवस्था, खिडक्या-दरवाजांची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करण्यात यावी.
४) बौद्ध स्मशानभूमीच्या जागेला कंपाऊंड वॉल बांधण्यात यावी तसेच प्रेत जाळण्यासाठी शेड उभारण्यात यावे.
५) महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूरनंतर मराठवाड्यातील पानगाव येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी आहेत. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीमअनुयायी अस्थीदर्शनासाठी येथे येतात. मात्र ग्रामपंचायत प्रशासन सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत असल्याने भाविकांची गैरसोय होते. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून संबंधित ठराव मंजूर करण्यात यावा.
६) दलित वस्तीच्या निधीतून आण्णाभाऊ साठे चौकातून स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी कलश प्रवेशद्वार (कमान) बांधण्यात यावे.
७) गावातील प्रत्येक वार्डात पाणी सोडण्याचा दिवस व वेळ निश्चित करून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात यावे.
८) गावातील प्रत्येक विद्युत पोलवर पथदिवे बसविण्यात यावेत तसेच विद्युत केबल व तारांची दुरुस्ती करून पावसाळ्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा.
९) रमाई घरकुल आवास योजनेसाठी नवीन प्रस्ताव मागवून मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठविण्यात यावेत.
१०) मंजूर झालेल्या रमाई आवास योजनेतील नरेगा निधी संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावा.
११) ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत दलित वस्तीच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांचे विवरण व माहिती प्रसिद्ध करण्यात यावी.
१२) ग्रामपंचायत कार्यालय, पानगाव येथे ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तात्काळ सुरू करण्यात यावे.
१३) गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच सध्या बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी.
१४) गावातील प्रमुख चौकात सार्वजनिक स्वच्छतागृहे (मुतारी) बांधण्यात यावीत.
१५) ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात यावा.
१६) १४ व्या वित्त आयोगातून अपंगांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
१७) चालू पंचवार्षिक कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या सर्व कामांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी.
वरील सर्व मूलभूत प्रश्न व सोयी-सुविधांबाबतच्या मागण्या आठ दिवसांत पूर्ण कराव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि गावातील नागरिकांच्या वतीने गावातील गटारांमधील गाळ हालगी वाजवत आणून ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्या दालनात टाकण्यात येईल तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर हालगी बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर रतन आचार्य (तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), वैभव कांबळे (माजी लातूर जिल्हा उपाध्यक्ष), सम्राट गोडबोले (तालुका सचिव), सुयोग्य आचार्य, तेजस आचार्य, कीर्तिशील आचार्य, कमलाकर आचार्य, सुग्रीव आचार्य, धम्मानंद ओटले, मयूर आचार्य, निलय कांबळे, कबीर उकंडे, संस्कार आचार्य, संघर्ष आचार्य, आदित्य आचार्य, रत्नराज आचार्य, सुजित बनसोडे, शुभम आचार्य, सम्राट आचार्य, सिद्धार्थ आचार्य, भानुदास आचार्य, निलेश आचार्य, मंथन आचार्य आणि संघपाल यांची स्वाक्षरी आहे.
vanchit-bahujan-aghadi-warns-haalgi-bajao-protest-over-lack-of-basic-amenities-in-pangaon-latur


