मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा होत असून राजेंद्र पाटोडे कोण आहेत हे जाणून घेऊयात.
संघटन उभारणी, विद्यार्थी चळवळ, सामाजिक आंदोलन, लेखक, पत्रकारिता आणि आंबेडकरी विचारांच्या प्रचार-प्रसारात सातत्याने कार्य करणारे राजेंद्र पातोडे यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
राजेंद्र पातोडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर अकोल्यातील विविध दैनिकांमध्ये सुमारे नऊ वर्षे पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९९० मध्ये भारिप बहुजन महासंघाच्या अकोला येथील कृषीनगर शाखेचे अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर २००० मध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले.
२००४ मध्ये अकोला जिल्हा युवक आघाडीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे २००९ आणि २०१२ मध्ये सलग दोन कार्यकाळ अमरावती विभागीय युवक अध्यक्ष म्हणून त्यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये संघटन विस्ताराचे काम केले. २०१८ मध्ये पक्षाच्या सम्यक विद्यार्थी आंदोलनासाठी अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी नेतृत्व केले. विद्यार्थी चळवळीला नवी दिशा देत अनेक युवकांना संघटनेशी जोडण्याचे काम त्यांनी केले.
२०१९ च्या अकोला लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुकाणू समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली. त्याच वर्षी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते म्हणूनही त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत युवा संघटनेची भक्कम उभारणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक जिल्ह्यांमध्ये युवा आघाडीचे जाळे अधिक मजबूत झाले.
राजेंद्र पातोडे हे लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी “आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न (१९२०–२०२४)” हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात अकोला जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा १०४ वर्षांचा राजकीय व सामाजिक इतिहास नोंदविण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन १४ मे २०२५ रोजी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
संघटनात्मक कार्यासोबतच त्यांनी विविध जनआंदोलनांमध्येही पुढाकार घेतला. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची हवा काढून केलेले आंदोलन, अकोला-महान मार्गावरील हजारो झाडे वाचविण्यासाठीचे ‘चिपको आंदोलन’, तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. पोलीस अत्याचाराच्या घटनांपासून ते जातीय तणावाच्या प्रसंगांपर्यंत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित, पीडित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल मानली जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची राज्यातील संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.





