मुंबई : दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स (X) खात्यावर यासंदर्भात पोस्ट केली आहे.
सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारकडून झालेला अमानुष हल्ला हा प्रत्येक नागरिकाला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा आणि लाठीमाराचा वापर करण्यात आला, ही केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीची झलक आहे.”
या घटनेच्या निषेधार्थ आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या बंदमध्ये सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“हा लढा केवळ एखाद्या पक्षाचा किंवा संघटनेचा नसून देशाच्या भविष्यासाठीचा आहे,” असेही सुजात आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.




