अहिल्यानगर (श्रीरामपूर): श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया ऊर्फ शेखर दुबैया यांची ११ जुलै २०२६ रोजी दुपारी अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. अवघ्या जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील ‘हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग’ येथे नशेत आलेल्या आरोपींनी जेवण मिळण्यास उशीर झाल्याचा आरोप करत प्रथम हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ करत मारहाण केली. हा वाद वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालक आकाश दुबैया यांनी मध्यस्थी करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याने चिडलेल्या आरोपींनी आकाश यांच्यावर खुर्ची आणि धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला.
या हल्ल्यात आकाश दुबैया यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी आलेले त्यांचे वडील आणि चुलत भाऊदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
या हत्येप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ या तिघांना अटक केली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. गुन्हेगारांवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर शहर सलग चार दिवस कडकडीत बंद ठेवले होते.
दरम्यान, अहमदनगर दौऱ्यावर असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिवंगत आकाश दुबैया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






