मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दिशा सालियान प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय गरमागरमी व आरोप-प्रत्यारोप सुरू असून या संवेदनशील विषयावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच आपली स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
दिशा सालियान प्रकरणातील तपासावर प्रश्न उपस्थित होत असतानाच, दुसरीकडे स्वतःची तरुण मुलगी गमावलेल्या तिच्या वडिलांना गलिच्छ भाषेत ट्रोल केले जाणे किंवा वेगळ्या पद्धतीने बघितले जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मोकळे म्हणाले. एकाकीपणाने मुलीच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी लढणाऱ्या बापाची भावना समजून न घेता त्यांच्यावर चिखलफेक करणे योग्य नाही. या प्रकरणात स्वच्छ आणि योग्य पद्धतीने निवाडा होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे, कोणालाही चुकीच्या पद्धतीने गोवण्यात येऊ नये आणि जे दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावरून शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या संदर्भात बोलताना सिद्धार्थ मोकळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्याचा पुनरुच्चार केला. आदित्य ठाकरेंना या प्रकरणात गोवले जात आहे असे शिवसेना किंवा त्यांचे मत असेल, तर त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला पाहिजे. ही घटना घडली तेव्हा आदित्य ठाकरे हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. मंत्री किंवा सुरक्षा रक्षकांसह फिरणाऱ्या नेत्यांचा डे-टू-डे कार्यक्रम आणि संपूर्ण दिनक्रम रेकॉर्डवर असतो. केवळ मी सहभागी नव्हतो किंवा ओळखत नाही असे भावनिक विधान करण्यापेक्षा, त्या दिवसाचा स्वतःचा अल्टरनेटिव्ह दिनक्रम आणि रेकॉर्ड जनतेसमोर तसेच न्यायालयासमोर मांडावा, जेणेकरून काय ते स्पष्ट होईल आणि बदनामीचा कट उधळून लावून प्रतिमा उजळवता येईल, असा उत्तम सल्ला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे.
तसेच या प्रकरणात ज्या एजन्सीने क्लोजर रिपोर्ट दिला त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. उच्च न्यायालयाने पुन्हा ही केस रि – ओपन करून तपासाचे निर्देश दिले असले तरी ६ वर्षे उलटून गेल्यानंतर किती पुरावे हाताशी उपलब्ध असतील याबाबत शंका उपस्थित होत असल्याचे मोकळे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्या लोकांना नेपाळ कनेक्शनमधून पैसा मिळत असल्याचे केलेले विधान अत्यंत गंभीर आहे. इतकी गंभीर गोष्ट केवळ प्रेससमोर बोलून सोडण्यासारखी नसून, ठाकरे कुटुंबाचे आणि पक्षाचे अस्तित्व पणाला लागलेले असताना राऊतांनी ही निष्काळजीपणाची भूमिका घेऊ नये. त्यांच्याकडे असलेली माहिती व पुरावे त्यांनी पोलीस, सीबीआय आणि तपास यंत्रणांकडे देऊन या नेपाळी गँगचा छडा लावला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
देशातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक महिला-मुलीची सुरक्षितता ही राज्य व केंद्र शासनाची जबाबदारी असून, एखाद्या मुलीच्या बापाचा जर मर्डरचा आरोप असेल तर त्याचा योग्य तपास होऊन दोषींना शासन झालेच पाहिजे, असे प्रतिपादन मोकळे यांनी पत्रकार परिषदेत केले.





