– संजीव चांदोरकर
देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !
….. देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय, गेली अनेक वर्ष चिखलात रुतून बसलेला होता, त्याचा गाडा किमान अंशतः का होईना, बाहेर काढल्याबद्दल,
…….देशातील खऱ्याखोट्या अस्मिताकेंद्री प्रश्नांपेक्षा, राजकीय अर्थव्यवस्थेच्या गाभ्यातील खऱ्या खऱ्या प्रश्नांना पुन्हा अजेंड्यावर आणल्याबद्दल…..
गेल्या दोन अडीच महिन्यातील घटनांची, (आणि त्या निमित्ताने झालेल्या चर्चांची) , पुनरुक्ती करण्याची गरज नाही. पण त्या घटना देशातील कोट्यवधी विद्यार्थी / तरुण वर्गाच्या मनात गेली अनेक वर्षे खदखदणाऱ्या असंतोषाच्या लाव्हावर पडलेली ठिणगी सिद्ध झाली हे खरे आहे.
गेले एकवीस दिवस देशातील विद्यार्थी, तरुणांचे विश्व या घडामोडींनी ढवळून निघाले. जरी गोदी मीडियाने ठरवून त्याची दखल घेतली नसली तरीही.
काल २० जुलै रोजी या विद्यार्थी तरुणांनी “चलो संसद”चा नारा देत संसदेवर मोर्चा काढण्याचे जाहिर केले. त्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिल्ली शिवाय देशातील अनेकानेक शहरात आंदोलने, धरणे जाहीर सभा असे कार्यक्रम घेतले गेले.
या सर्व कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची एकत्रित संख्या काही लाख असू शकते. फार पुर्वतयारी नाही. साधनसामुग्री नाही. तरीदेखील हे घडले! अनेक अर्थाने ही खूप मोठी आणि विश्वास देणारी घटना आहे.
कालच्या एका दिवसातील दिल्लीतील जंतरमंतर वरीलच नाही तर संपूर्ण देशातील विद्यार्थी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगत आहे, की देशातील विद्यार्थी आणि तरुण, त्यांच्या जीवनाची, भवितव्याची जी काही हेळसांड सुरू आहे त्यामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यासाठी ते सोशल मीडियाच्या बाहेर येऊन रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत. शासनाच्या दादागिरीला सामोरे जाण्यास तयार आहेत.
हा मेसेज गेल्या दोन अडीच महिन्यात धिम्या गतीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा निचोड आहे.
संपूर्ण आंदोलनबद्दल माझी देखील क्रिटिकल मते होती. आहेत. पण मनात कोणताही किंतू न बाळगता घडलेल्या प्रक्रियेचे स्वागत केले पाहिजे.
सोशल मिडियावरील निषेधाचे ट्विटर स्टॉर्म नवीन नाहीत. ती वादळे उठतात आणि शमतात देखील. पण यावेळी तरुण सोशल मीडियावर निषेध नोंदवून थांबले नाहीत.
जंतर मंतर येथील आंदोलनात सोनम वांगचुक यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले आणि आंदोलनाचा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. जंतर-मंतरवर वांगचुक यांनी आमरण उपोषण आरंभले. त्यात डाव्या आणि आंबेडकरवादी पक्ष संघटनाच्या विद्यार्थी तरुणांच्या संघटना हिरीरीने सामील झाल्या. त्या संघटनातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीनी वांगचुक यांच्या बरोबर उपोषणात आपल्या जीवाची बाजी लावली.
देशाप्रती/ समाजाप्रती काहीएक बांधिलकी मानणाऱ्या निवडक साहित्यिक, पत्रकार, कलावंतांनी प्रत्यक्ष जाऊन, किंवा विविध व्यासपीठांवरून पाठिंबा दिला. भाजप व्यतिरिक्त जवळपास देशातील प्रत्येक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या सर्वानी राजकीय परिपक्वता दाखवली आहे.
कोणत्याही देशासाठी शिक्षण क्षेत्राचे स्थान आणि महत्व एकमेवद्वितीय आहे, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय कोणत्याही दृष्टिकोनातून बघितले तरी. कारण त्यातून देशाचे, समाजाचे, अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरत असते. धिम्या गतीने उलगडत जाणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे ही.
ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन नुसार देशात आजच्या घडीला साडेचार मुले मुली उच्च शिक्षण घेत आहेत. त्यात देशातील बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सतत वाढते आहे. हा आकडा हृदयात स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन प्रौढ होणाऱ्या तरुणांचा आकडा आहे. त्यात दरवर्षी घट न होता तो वाढतच आहे.
हे आंदोलन जरी उच्च शिक्षण घेणाऱ्या , स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरु केले असले तरी त्या निमित्ताने एकूणच शिक्षण क्षेत्राचे जे अनेक गंभीर प्रश्न आहेत ते ऐरणीवर आले पाहिजेत. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे त्याचा बॅकलॉग प्रचंड आहे.
मोठी यादी करता येईल. देशाच्या जीडीपीच्या किमान सहा टक्के शिक्षण क्षेत्रावर खर्च व्हावेत असा नॉर्म असताना दरवर्षी दोन-तीन टक्क्यांपेक्षा जास्त खर्च होत नाहीये. फक्त एक टक्का वाढ केली तरी तीन लाख कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. देशात फक्त गेल्या दहा वर्षात एक लाख शाळा बंद पडल्या आहेत. शिक्षण क्षेत्राचे लाज वाटावी एवढे व्यापारीकरण केले गेले आहे. शिक्षण काही एन्ड इन इटसेल्फ नाही. नसले पाहिजे. त्याचा संबंध रोजगार / बेरोजगारीशी आहे. देशात दरवर्षी १४० लाख तरुण रोजगार क्षेत्रात नव्याने भरती होत असतात. आणि रोजगार जेमतेम २० ते ३० लाख तयार होतात.
दोन अडीच महिन्यानंतर हे आंदोलन नक्कीच एका मैलाच्या दगडावर आले आहे. हे असेच एका सरळ रेषेत सुरु राहू शकणार नाही हे उघड आहे.
पण यातून संपूर्ण देशात जी ढवळणूक झाली आहे, त्यातून जी ऊर्जा तयार झाली आहे, विद्यार्थी , तरुणांमध्ये जी जागृती तयार झाली आहे ती खूप मोलाची आहे. कारण हेच विद्यार्थी / तरुण या शतकातील भारत आहेत. कोणीही त्यांना सब्स्टीट्युट नाही.
ती ऊर्जा देशातील एकूणच शिक्षण क्षेत्र अधिक विद्यार्थी केंद्री होण्यासाठी, शासनाला सर्वार्थाने अधिक जाबदायी बनवण्यासाठी कामी येईल अशी आशा आहे.





