औरंगाबाद : महावितरणकडून वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महावितरणचे मुख्य अभियंता कुठेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीने त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून वीज ग्राहकांना संदेश पाठवून ४८ तासांच्या आत जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र अनेक ग्राहकांमध्ये यामुळे संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुपचंद गाडेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत राज्यातील कोणत्याही वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. असे असताना महावितरणच्या नावाने ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत सक्तीचे संदेश पाठविले जात असल्याने शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
महावितरणने तात्काळ ग्राहकांपर्यंत स्पष्ट भूमिका पोहोचवून स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे जाहीर करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, शहराध्यक्ष पंकज बनसोडे, जिल्हा महासचिव प्रविण हिवाळे, अंजन साळवे, जिल्हा संघटक राजन किर्तने, जिल्हा सचिव उमेश सरदार, रामदास नाना वाघमारे, इक्बाल भाई, युवा शहराध्यक्ष (पश्चिम) राहुल मकासरे, प्रसिद्धी प्रमुख भावी गवई, जिल्हा सदस्य अंकुश जाधव, बबलू बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






