नांदेड : नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी नेते संतोष गव्हाणे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव दीपक मगर, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, नगरसेवक ॲड. बिलाल शेख, के. ए. वने, प्रा. प्रल्हाद हिंगोले, धाराजी इंगोले, वाढवे सर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
भूसंपादनाच्या मोबदल्याचे फेरमूल्यांकन करून शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच २४ डिसेंबर २०२५ रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रद्द अथवा बदल ठरलेले निवाडे रद्द करून त्यानुसार फेरमूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.०२/अ, दिनांक २४ जानेवारी २०२३ तसेच २१ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार जमिनीचे मूल्यांकन करण्यात यावे. पुनर्वसन व पुनर्वसाहत भूसंपादन कायदा, २०१३ अन्वये बाधित शेतकऱ्यांना सर्व लाभ देण्यात यावेत, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
संपादित करण्यात आलेले क्षेत्र ग्रीनलँड क्षेत्रात येत असल्याने संबंधित सर्व जमिनी बारमाही बागायती म्हणून ग्राह्य धराव्यात, तसेच वाजवी भावाने खरेदी करण्याचे कारण दाखवून वगळण्यात आलेले उच्चतम खरेदीखत ग्राह्य धरून फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय बाधित शेतकऱ्यांना प्रती एकर एक कोटी रुपये मोबदला देण्यात यावा, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली. “जमीन आमची, हक्क आमचा; अन्याय तुमचा चालणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.





